उन्हाळ्याच्या संध्याकाळचा रानातला पाऊस
उन्हाळ्याच्या संध्याकाळचा रानातला पाऊस उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्यांनी रानात जायचंच असा शिरस्ता असणारा तो काळ होता. दिवसभर खूप काम केलं आणि घरच्यांचा मूड चांगला असला तर कधीकधी ४ चा पिक्चर बघायला घरी जायला मिळायचं. नाहीतर संध्याकाळ पण रानातच जायची. तशी रानातली संध्याकाळ मजेशीर असायची. गुरांच्या गोठ्याची सावली बॅट-बॉल खेळण्याऐवढी पुढे पडली की संध्याकाळ सुरू झाली असं म्हणायचो आम्ही. 'ऊन खाली झाल्यावर खेळा' अशा घरच्यांच्या आदेशामुळे नाखुषीने थांबवलेले खेळ पुन्हा सुरू व्हायचे. बॅटबॉल, विटीदांडू, इटकार नाहीतर मग गट्टया. कधीकधी ढेकळाच्या वावरात जाऊन एकमेकांना ढेकळे हाणत भारत पाकिस्तान युद्ध पण खेळलं जायचं. खेळण्या बरोबर संध्याकाळची ठरलेली कामं पण असायची. पाटावर, ज्यात अख्या हयातीत कधी पाणी आलं नाही, तिथे बांधलेल्या म्हशी वर गोठ्यात आणून बांधायच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेण काढणं, जे मला कधीच नीट जमलं नाही. पण काम कमी आणि पोरं जास्त असल्यामुळं काम कधी संपलं कळायचं पण नाही. उन्हाळ्याचे जवळपास सर्व दिवस थोडेफार असेच असायचे. पण एखाद्या दुपारी